कन्नड, जि. औरंगाबाद, दि. 17 फेब्रुवारी 2014:
माजी शिवसेना आमदार श्री नामदेवराव पवार यांनी असंख्य सहका-यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी श्री मोहन प्रकाशजी, मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे व पालकमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 17 फेब्रुवारी 2014 रोजी कन्नड येथे झालेल्या जाहीर सभेत श्री पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व पंचायत समिती सदस्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
केवळ काँग्रेसच देशाचा विकास करू शकते, याची खात्री पटल्याने शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे श्री नामदेवराव पवार यावेळी म्हणाले. श्री मोहन प्रकाशजी यांनी श्री पवार यांचे पक्षात स्वागत केले. सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. विरोधकांकडे ना इतिहास आहे ना विचार. केवळ भाषणबाजी करून जे जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील विरोध पक्षांवर घणाघाती हल्ला केला. जाहिरातबाजीशिवाय विरोधकांचे काडीचेही कर्तृत्व नाही, असे सांगून त्यांनी देशाच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेसने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी श्री पवार यांच्या प्रवेशामुळे औरंगाबाद व जालना जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती आणखी मजबूत झाल्याचे सांगितले. येत्या निवडणुकीत हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ निश्चितपणे काँग्रेसने जिंकलेले असतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या जाहीर सभेला आ.श्री अब्दुल सत्तार, आ.श्री कल्याण काळे, आ.श्री एम.एम. शेख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री अरूण मुगदिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री केशवराव औताडे, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष श्री सुरेश पाटील, माजी आमदार श्री नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शारदाताई जारवाल आदी नेत्यांसह सुमारे 20 हजार नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment