वर्ष २०१६- १७ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्ट्ये
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात सुमारे १०.५४ टक्क्यांची वाढ. गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक रुपये ३३,५१९. १५ कोटी होते, ते आता रुपये ३७,०५२.१५ कोटी प्रस्तावित
- अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकांतर्गत ज्या विविध योजना व कार्ये प्रस्तावित केली आहेत, त्याबाबत कालबध्द अंमलबजावणीवर भर. सदर कालबध्द अंमलबजावणीबाबत संबंधित अधिका-यांनी कालबध्द कृती आराखडा तयार करावयचा असून त्याच्या अंमलबजावणीसाठी ते व्यक्तीश: जबाबदार राहतील
- या अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामे वेळापत्रकानुसार पारदर्शकपणे व गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता व्हावी यासाठी सर्व कामांमध्ये तसेच खरेदी विषयक बाबींमध्ये गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीवर (Quality Control)भर देण्यात येणार आहे
- निविदा प्रक्रिया ही अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक व विश्वासार्ह करण्यावर भर
- नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रभावी नागरी सेवा सुविधा पुरविण्यासाठी विभागस्तरावर (Ward Office) प्रशासनास बळकटी देण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये नागरी सेवा-सुविधा विषयक कार्ये अधिक वेगाने व प्रभावी पध्दतीने पार पाडली जावीत व प्रशासनात अधिक लोकभिमुखता यावी, यासाठी विभाग स्तरावर अधिक प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करण्याचे प्रस्तावित
- विविध नागरी सेवा-सुविधा विषयक कार्ये तसेच प्रशासकीय कार्यवाहीमध्ये माहिती तंत्रज्ञान आधारित सुधारणांवर भर देता यावा, यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत माहिती तंत्रज्ञान संबंधित प्रस्तावित अंदाजपत्रकात सुमारे १६ टक्क्यांनी वाढ
- गोर-गरिबांना अधिक चांगल्या वैद्यकीय व आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित प्रस्तावित अंदाजपत्रकात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ
- घन कचरा व्यवस्थापन विषयक प्रस्तावित अंदाजपत्रकात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ- मुलुंड व देवनार येथील क्षेपणभूमी वरील कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याबाबत प्रकल्प हाती घेणार- कांजूरमार्ग येथील भराव भूमीवरील कार्याचा विस्तार शास्त्रोक्त पध्दतीने करण्याचे प्रस्तावित- घन कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा व ऐरोली येथे नविन सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित
- मुंबई अग्निशमन दल विषयक प्रस्तावित अंदाजपत्रकात सुमारे २४ टक्क्यांनी वाढ
- शहरी गरिबांसाठी असणा-या तरतूदींमध्ये सुमारे ८ टक्क्यांनी वाढ. यासाठी ९१८७.९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम ८५३८.९१ कोटी एवढी होती
- एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमासाठी गेल्या वर्षी असणारी रुपये १० कोटींची तरतूद वाढवून यावर्षी रुपये १०० कोटी इतक्या रक्कमेची तरतूद प्रस्तावित
- समुद्रात सोडल्या जाणा-या सांडपाण्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्याचे प्रकल्प कुलाबा, भांडूप, वरळी, वांद्रे व वर्सेावा येथे निर्माण करण्यावर विशेष भर.यामुळे केवळ समुद्राच्या पाण्याची गुणवत्ताच सुधारणार नसून प्रक्रिया केलेले सांडपाणी हे पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी वापरणे शक्य होणार आहे
- मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व चौपाट्या तसेच पुरातन वास्तू (Heritage Buildings) याठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचे प्रस्तावित
No comments:
Post a Comment