Tuesday, 9 February 2016

सलग पराभवांच्या नैराश्यातून सरकारची विरोधी पक्षांविरुद्ध कारवाई!: विखे पाटील कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष खा. अशोक चव्हाणांच्या पाठीशी

सलग पराभवांच्या नैराश्यातून सरकारची विरोधी पक्षांविरुद्ध कारवाई!: विखे पाटील
कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष खा. अशोक चव्हाणांच्या पाठीशी
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी २०१६:                     
केंद्र व राज्यात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला देशभरातील विविध निवडणुकांमध्ये सलग पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. निवडणुकीत लोकमान्यता मिळत नसल्यामुळे आता त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई सुरु केली असल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली.
प्रदेश कॉंग्रेसच्या गांधी भवनस्थित कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी हा राजकीय सूड उगविण्याचा प्रकार आहे. यापूर्वीच्या राज्यपालांनी खटला चालविण्याची परवानगी नाकारलेली आहे. तरीही राजकीय दबाव आणून सरकारने सीबीआयला पुन्हा परवानगी मागण्यास भाग पाडले. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत सरकारच्या या निर्णयाचे संतप्त पडसाद उमटले व सर्व आमदारांनी एकमताने सरकारच्या निषेधाचा ठराव पारित केला, अशी माहिती विरोधी पक्ष नेत्यांनी दिली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सुरु असलेली कारवाई सरकारच्या कारस्थानाचा भाग असल्याचे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या विधानातून स्पष्ट होते. खा. सोमय्या राजभवनचे किंवा राज्य सरकारचे किंवा सीबीआयचे प्रवक्ते नाहीत. तरीही राज्यपाल काय निर्णय घेणार याची माहिती ते पाच-सहा दिवस अगोदर कसे जाहीर करतात? सीबीआय कोणाला अटक करणार, ईडी काय कारवाई करणार, लाचलुचपत प्रतिबंधक खाते कुठे छापे टाकणार, याची भविष्यवाणी ते करतात आणि त्यानुसार कारवाई होते. याचाच अर्थ विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सुरु असलेली कारवाई, हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग नसून राजकीय षडयंत्र असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असेही राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.
मागील काही काळामध्ये देशातील व महाराष्ट्रातील सरकारविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच बिहार विधानसभा निवडणूक, मध्य प्रदेशातील लोकसभा व झारखंडमधील विधानसभा पोटनिवडणूक, गुजरात व मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणूक अशा विविध निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सलग पराभव पत्करावा लागला. या अपयशामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. लोकशाही मार्गाने लोकांची मने वळविता येत नसल्यामुळे काश्मीरपासून केरळपर्यंतच्या कॉंग्रेसच्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप विखे पाटील यांनी अनेक उदाहरणे देत केला.
दरम्यान, आज दुपारी ३ वाजता विधान भवनातील कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयात कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाराष्ट्रातील समस्या व वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत हे सरकार साफ अपयशी ठरल्यामुळे आगामी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. नसीम खान आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment