कर्जमाफीच्या मागणीसाठी कांग्रेस आघाडीने विधिमंडळाचे कामकाज रोखले
दि. ८ डिसेंबर, २०१५
शेतकरी कर्जमाफी व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या पॅकेजसाठी आज कॉंग्रेस आघाडीने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कामकाज सुरु होण्याच्या अगोदर कॉग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या तीव्र निदर्शनांच्यावेळी कॉंग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन दणाणून सोडले. संत्र्याच्या पडलेल्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेस आमदारांनी सत्तारूढ आमदारांना संत्र्याचे मोफत वितरण केले. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारही सहभागी झाले होते.
सभागृहात बोलताना विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचा प्रश्नांवर आजवर सभागृहात खूप चर्चा झाली; परंतु शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे भाजप सरकारने आता‘मन की बात’ संपवून ‘काम की बात’ करावी असे सांगितले. चर्चा करण्याची वेळ निघून गेली असून आता शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर आधी कर्जमाफीची घोषणा करा असा आग्रह त्यांनी धरला. या मुद्द्यावर कॉंग्रेस आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृह स्थगित करावे लागले.
No comments:
Post a Comment