कामगिरी शून्य असताना जनतेच्या कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी कशाला?
केंद्र सरकारच्या वर्धापन दिनावरील खर्चावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांची बोचरी टीका
मुंबई, दि. 26 मे 2016:
मागील दोन वर्षातील कामगिरी शून्य असताना केंद्र सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनी जाहिराती व आत्मस्तुतीच्या कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी कशाला? अशी संतप्त विचारणा काँग्रेस नेते व राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी केली आहे.
देशातील 11 राज्ये तीव्र दुष्काळाला तोंड देत असताना सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करते, हे असंवेदनशीलतेचे द्योतक असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. जाहिरातबाजी करून आणि सेलिब्रेटीजला बोलावून कर्तबगारी सिद्ध होत नाही. त्यापेक्षा सरकारने हाच कोट्यवधींचा निधी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी खर्च केला असता तर त्याचे स्वागत झाले असते, असेही सचिन पायलट यांनी सांगितले.
पायलट यांनी गुरूवारी दुपारी प्रदेश कार्यालय गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. सुरेश शेट्टी, माजी मंत्री आ. डी.पी. सावंत, प्रदेश प्रवक्ते आ. भाई जगताप, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, भाजपचे केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशातील अनेक राज्यात दुष्काळ असताना मोदी सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकले नाही. महाराष्ट्रात एका वर्षात 3228 शेतकरी आत्महत्या झाल्या. महाराष्ट्रात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजपचेच सरकार आहे. तरीही येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यायला साधा वेळ देखील मिळाला नाही. मराठवाड्यात जाऊन त्यांना शेतकऱ्यांची चौकशी करण्याची गरज भासली नाही. याच मोदींनी कृषीमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल, एवढा भाव देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात शेतीमालाला किती भाव मिळाला, याची पंतप्रधानांनी चौकशी करावी, अशी सूचना त्यांनी मांडली. शेतकरी हिताच्या गप्पा करणाऱ्या या सरकारने भू-संपादन कायद्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांवर घाव घालण्याचाच प्रयत्न केला. जे भू-संपादन विधेयक भाजपसह सर्व पक्षांनी बहुमताने पारित केले होते, त्याच विधेयकात सरकार बदलताच अवघ्या 7 महिन्यांनी आमूलाग्र बदल करण्याची गरज मोदींना का भासली, अशी विचारणा सचिन पायलट यांनी केली.
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी चौफेर हल्ला चढवला. मोदींनी 100 दिवसांत विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, 750 दिवस झाले तरी अजून ना काळा पैसा आला ना लोकांना 15 लाख रूपये मिळाले. उलटपक्षी याच सरकारच्या कार्यकाळात बॅंकांचे 9 हजार कोटी रूपये बुडवून विजय मल्ल्या पसार झाला. विदेशात जाऊन बसलेल्या ललीत मोदीला वाचविण्यासाठी भाजपचेच नेते धडपडताना दिसत आहेत. आर्थिक विकास दर ढासळतो आहे. निकषात बदल करून हा दर जास्त भासवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. भारताची निर्यात घटली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे 60 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. परंतु, केंद्र सरकारने त्याचा पुरेसा फायदा पेट्रोल-डिझेलच्या ग्राहकांना मिळवून दिला नाही. मोदी सरकारने दोन कोटी रोजगार निर्मितीची घोषणा दिली होती. प्रत्यक्षात आजवर केवळ 1 लाख 37 हजार लोकांनाच रोजगार मिळाला आहे. मोदींनी लोकांना खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली. परंतु, त्या स्वप्नांचा बुडबुडा दोन वर्षातच फुटल्याची टीका युवा नेते सचिन पायलट यांनी केली.
भ्रष्टाचारासंदर्भात भाजपचे धोरण दुतोंडी असल्याचा घणाघात त्यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात केवळ आरोप झाले तरीही अनेकांनी राजीनामे दिले होते. अनेक नेत्यांवरील आरोप आजही सिद्ध झालेले नाहीत. परंतु, नैतिकता म्हणून त्यांनी पदे सोडली होती. दुसरीकडे ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नाकाखाली भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. राजस्थानात भूमि घोटाळा झाला. पण् त्याची दखलही केंद्र सरकारने घेतली नाही. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यात 50 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. परंतु, मोदी सरकारने त्यावर लक्ष दिले नाही. दुसरीकडे हिमाचल प्रदेश काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या घरी मुलीचे लग्न सुरू असताना भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या नावाखाली राजकीय द्वेषातून छापेमारी केली जाते. हा भाजपचा दुटप्पीपणा नव्हे का, अशी विचारणाही पायलट यांनी केली.
मोदी सरकारचे परराष्ट्र धोरणही साफ अपयशी ठरले आहे. ‘एक सर के बदले दस सर’ची भाषा करणारे मोदी अचानक पाकिस्तानबाबत मवाळ झाले. देशाला अंधारात ठेवून अचानक पाकिस्तानला जाऊन आले. पण फोटोसेशन करून दोन देशांचे संबंध सुरळीत होत नाहीत. मोदी पाकिस्तानला जाऊन आले आणि आठ दिवसांत पठाणकोटवर अतिरेकी हल्ला झाला. ज्या पाकिस्तानातून हल्लेखोर अतिरेकी आले, त्याच पाकिस्तानला मोदींनी हल्ल्याच्या चौकशीसाठी बोलावले. मोदी सरकारच्या कार्यकाळात पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, चीन अशा सर्वच शेजारी देशांशी भारताच्या संबंधात कटुता निर्माण झाली, असे पायलट यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या कामकाजावर केवळ या देशातील जनता आणि विरोधी पक्ष टीका करीत नाहीत तर शिवसेनेसारखे सरकारचेच घटक पक्षसुद्धा टीका करतात. परंतु, शिवसेनेची ही टीका निरर्थक आहे. त्यांना सरकारचा कारभार मान्य नसेल तर केवळ मुखपत्रातून टीका करण्याऐवजी सरकारबाहेर पडावे, असेही सचिन पायलट म्हणाले.
No comments:
Post a Comment