मंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशीच कुपोषित बालकाच्या मृत्यूने सरकारचे अपयश चव्हाट्यावर!
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
मुंबई, दि. 22 सप्टेंबर 2016:
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुपोषणग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना त्याच दिवशी आणखी एका आदिवासी बालकाचा मृत्यू होण्याची घटना, पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात जाण्यास बंदी लागू होणे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कुपोषणासंदर्भात दिलेल्या नोटीसमधून राज्य सरकारचे अपयश चव्ह्यावर आल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे कुपोषण पाहणीचा दौरा करीत असताना राहूल वाडकर नामक कुपोषित आदिवासी बालकाचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे. मुंडे यांचा हा दौरा पालघरचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विधानसभा मतदारसंघात असताना सावरा या दौऱ्यातून गायब होते. जनतेच्या असंतोषाला घाबरून एखाद्या मंत्र्याने स्वतःच्या मतदारसंघात न जाण्याचा हा पहिला प्रकार असेल. मुंडे यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्यातील वाढत्या कुपोषणाची गंभीर दखल घेऊन नोटीस दिली. एका पाठोपाठ घडलेल्या या घटनांनी राज्यातील वाढत्या कुपोषणाबाबत सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह लावले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना अद्याप मुख्यमंत्र्यांनी यावर साधे भाष्य देखील केलेले नाही. विदेशातून परतल्यावर तरी मुख्यमंत्री या प्रकाराची गंभीर दखल घेऊन राज्यातील आदिवासी भागांचा दौरा करतील का? अशीही विचारणा विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment