कांजूर क्षेपणभूमी व प्रक्रिया केंद्रातून येणाऱया दुर्गंधीवर तोडगा शोधावा
- स्थायी समिती अध्यक्ष श्री. फणसे यांचे क्षेपणभूमी पाहणी दौऱयाप्रसंगी निर्देश;
तांत्रिक उपाय शोधून लवकरच संयुक्त बैठक आयोजित करणार – आयुक्त श्री. मेहता
कांजूर क्षेपणभूमी आणि कचरा प्रक्रिया केंद्रातून येणारी दुर्गंधी ही परिसरातील नागरिकांच्या नाराजीचे कारण आहे, त्यावर तोडगा निघाला तर या क्षेपणभूमीला होत असलेला विरोध मावळेल, त्या दृष्टीने प्रशासनाने त्वरेने पावले उचलावीत, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. यशोधर फणसे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
कांजूर क्षेपणभूमी व प्रक्रिया केंद्राची संपूर्ण पाहणी केली असून त्याच्या तांत्रिक बाबी व उणिवा समजून घेण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल. दुर्गंधी रोखण्यासाठी तांत्रिक उपाय शोधून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित करु, असे आश्वासन महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी प्रशासनाच्या वतीने दिले.
स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशोधर फणसे आणि स्थायी समितीचे सदस्य तसेच महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी आज (दिनांक १९ नोव्हेंबर, २०१५) मुलुंड मुख्य क्षेपणभूमी, कांजूर मुख्य क्षेपणभूमी आणि देवनार मुख्य क्षेपणभूमी यांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
गोराई कचरा हस्तांतरण केंद्र येथून दोन वर्षे (७३० दिवस) कालावधीसाठी कचरा काढून तो मुलुंड, देवनार, कांजूर येथील मुख्य क्षेपणभूमीपर्यंत अंतिम विल्हेवाट लावण्याकरीता वाहून नेण्याबाबतचा विषय स्थायी समितीच्या सभेमध्ये दिनांक ०९ नोव्हेंबर, २०१५ रोजी चर्चेस आला होता. या अनुषंगाने स्थायी समितीने हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी आमदार श्री. अशोक पाटील, आमदार श्री. सुनील राऊत, आमदार श्री. तुकाराम काते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र आंबेरकर, भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री. मनोज कोटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते श्री. संदीप देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री. धनंजय पिसाळ, समाजवादी पक्षाचे गटनेते श्री. रईस शेख, एम/पूर्व प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. अरुण कांबळे, स्थायी समितीचे सदस्य श्री. विठ्ठल खरटमोल, श्री. प्रमोद सावंत, श्री. रमेश कोरगांवकर, श्री. विनोद शेलार, श्री. प्रवीण छेडा तसेच नगरसेवक श्री. नंदू विचारे, माजी महापौर श्री. दत्ता दळवी, उप आयुक्त (विशेष) श्री. राजेंद्र वळे, उप आयुक्त (परिमंडळ – ५) श्री. भारत मराठे, उप आयुक्त (महापालिका आयुक्त) श्री. रमेश पवार, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) श्री. अन्सारी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
समितीने प्रारंभी मुलुंड क्षेपणभूमीची पाहणी केली. त्यानंतर कांजूर क्षेपणभूमी आणि तेथील जैविक प्रक्रिया केंद्र व अखेरीस देवनार क्षेपणभूमीची पाहणी केली. त्यावेळी मुख्यत्वे कांजूर येथील घन कचरा प्रक्रिया प्रकल्पातून वायूनिर्मिती सुरु झाली असून बायोरिऍक्टर तंत्रज्ञानाच्या आधारे कचऱयावर प्रक्रिया करणारा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचे संबंधित अधिकारी व तंत्रज्ञांनी सांगितले. कांजूर क्षेपणभूमी व तेथील प्रक्रिया केंद्राची सविस्तर माहिती सेफ ट्रीट इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा.लि. चे तंत्रज्ञ श्री. विवेक दलाल यांनी सादर केली. तथापि, या कचऱयातून स्रवणारे दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात दुर्गंधी पसरविण्यास कारणीभूत असल्याचा आक्षेप आमदार श्री. अशोक पाटील, आमदार श्री. सुनील राऊत, श्री. धनंजय पिसाळ, श्री. दत्ता दळवी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी नोंदविला. तर श्री. रमेश कोरगांवकर यांनी सांगितले की, प्रकल्प उभारण्यापूर्वी करण्यात आलेल्या सादरीकरणाप्रमाणेच कार्यवाही होत आहे किंवा कसे, प्रक्रिया केल्यानंतर प्रकल्पातून प्राप्त होणारे पाणी उद्यानांना पुरविले जाते आहे किंवा कसे, या सर्व बारकाव्यांचे प्रशासनाने आढावा घेऊन माहिती द्यावी.
लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी संपूर्ण प्रकल्पाची पायपीट करुन पाहणी केली व सर्वंकष माहिती समजून घेतली. सदर प्रक्रिया केंद्राची पूर्ण पाहणी केली असून त्याच्या तांत्रिक बाजूंचे सादरीकरण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कंत्राटदार, प्रक्रिया केंद्राचे तंत्रज्ञ यांना येत्या आठवड्यात महापालिका मुख्यालयात येण्याच्या सूचना आयुक्त श्री. मेहता यांनी केल्या. प्रक्रिया केंद्रातून येणाऱया दुर्गंधीवर नियंत्रण करण्यासाठी निश्चितच उपाय शोधून काढू आणि त्याची माहिती सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना संयुक्त बैठकीत दिली जाईल, असे श्री. मेहता यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त श्री. मेहता यांनी कांजूर प्रकल्पाची संपूर्ण पाहणी करुन तातडीने कार्यवाही हाती घेतल्याबद्दल आमदार श्री. सुनील राऊत तसेच श्री. धनंजय पिसाळ, श्री. दत्ता दळवी यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त केले. कांजूर प्रकल्पाला नागरिकांचा क्षेपणभूमी म्हणून विरोध नसून त्यात कोणतेही राजकारण नाही. मुंबईतील कचऱयाचे व्यवस्थापन करताना नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, एवढीच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची भावना असून त्यामुळे सारे एकत्र भेटीला आले आहेत, असे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
मुलुंड आणि देवनार क्षेपणभूमी येथे करण्यात येत असलेले कचऱयाचे व्यवस्थापन, त्याविषयी असलेल्या तांत्रिक अडचणी, भविष्यातील नियोजन यांचादेखील उहापोह या दौऱयात करण्यात आला.
No comments:
Post a Comment